नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि कॉंग्रेसने काही जागांसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीतील आपल्या मित्र पक्षांनी अद्यापही आपले उमेदवार घोषित केले नाहीत. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता केला जाणार आहे. तर अनेक ठिकाणी नव्या उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यातच मागील काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या शांतिगीरी महाराजांची विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी भेट घेतल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीतही ताणातणी सुरू असताना धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत नाशिकच्या उमेदवारीविषयी ‘गुप्तगू’ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसल्याचे नमूद करत आपण महाराजांचे फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा निवडणुक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला नाशिकचे महंत शांतिगीरी महाराज यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यांनी अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. महाराज यांचे भक्त जळगाव, धुळे, नाशिक आणि औरंगाबाद याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे भामरे यांची भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.