नाशिक: रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकार आणि काही मराठा नेत्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. राज्यातील काही प्रस्थापित मराठा घराण्यामुळे विस्थापित मराठ्यांना आरक्षणापासून वंचित राहावं लागत असल्याचा आरोप खोत यांनी केलाय. मूठभर नेत्यांमध्ये मराठा समाजातील गरीब लोकांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या विसंगतीमुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, असा आरोप खोत यांनी केलाय. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबाबतही सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिलीय. शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. याच अस्वस्थतेमुळे सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असावं. भाजप-शिवसेनेची युती नैसर्गिक होती, असं खोत म्हणाले. दरम्यान, सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
सदाभाऊ खोत यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा
सदाभाऊ खोत हे सध्या उत्तर महराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असल्याची माहिती त्यांनी दिलीय. पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दौऱ्यानंतर वेळ पडली तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशाराही खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण- खोत
सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे. प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही, असा टोला खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्याचबरोबर ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे आणि हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, अशी खोचक टीकाही खोत यांनी केलीय.