मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या परिस्थितीवरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात टीकायुद्ध सुरु असलेले पाहायला मिळत आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, तसेच कार्यालये मिळून १० ठिकाणी सीबीआयने आज सकाळी धाडी टाकून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली असून, देशमुख यांच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे याचिकाकर्त्या ऍड.जयश्री पाटील यांनी, अनिल देशमुखांच्या अटकेची मागणी केली आहे. सीबीआयने अनिल देशमुखांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरची आणि छापेमारीची कारवाई योग्य असल्याचे सांगत त्यांनी, महाराष्ट्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड थांबवायची असेल, तर अनिल देशमुखांना अटक होण्याची गरज आहे आणि तसे केले नाही तर पुरावे नष्ट होण्याची देखील भीती असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं.
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची, सीबीआयने तब्ब्ल ११ तास चौकशी केलीय असून, त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.