२०१४-२०१९ दरम्यान राज्यामध्ये भाजपा शिवसेनेबरोबर युती करुन सत्तेत नसती तर कारभार अधिक चांगला आणि वेगवान झाला असता. खास करुन काही कठीण निर्णय वेगाने घेता आले असते,” असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि अशोका विद्यापिठातील त्रिवेदी सेंटर फॉर पॉलिटिकल डेटाने संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेल्या एका ऑनलाइन पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान फडणवीस यांनी हे मत मांडले. या सोहळ्यामध्ये फडणवीस यांनी काँग्रेचे नेते आणि माजी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्याशी गप्पा मारताना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
ते म्हणाले, ” ज्या पक्षाबरोबर युती होती त्याच पक्षाबरोबर सत्ता संघर्ष होत असल्याने तुम्हाला राज्य सोडून केंद्रात जाता येत नाहीय का असा पुढील प्रश्न देवरा यांनी विचारला. त्यावर बोलताना फडणवीस यांनी, “त्या पाच वर्षींमधील कारभार सुरळीत झाला असला तरी तो त्रासदायकही होता. हे का घडत आहे असं या पाच वर्षांच्या काळात अनेकदा वाटलं,” “शिवसेना जरी सत्तेमध्ये होती तरी सरकारने काही निर्णय घेतल्यानंतर ते स्वत:ला विरोधी पक्षाच्या भूमिकेत नेत टीका करायचे,” असंही म्हटलं आहे.
“मात्र काही काळाने तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. मी त्यानंतर मला हवं ते मी करणार अशा भूमिकेत गेलो. मी माझ्या मंत्रीमंडळाचा कारभार करताना अनेक निर्णय हे एकमताने घेतले. मला यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागायची. अनेकदा मला पडद्यामागे अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागायची. एखाद्या विषयावर एकमत असावे म्हणून अनेकदा बैठकी आणि संवाद घडवून आणावे लागायचे. त्याऐवजी एकाच पक्षाचे सरकार असते तर काम अधिक चांगले आणि वेगाने झाले असते,” असं फडणवीस म्हणाले.