बेळगाव : एकीकडे पंढरपूरात विधानसभेची पोटनिवडणूक ऐन रंगात असताना, तिकडे बेळगावात देखील लोकसभा पोटनिवडणुकीचा धुरळा उडत आहे. भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मात्र त्याआधीच बेळगावातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या सभानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य्क्ष जयंत पाटील यांनी बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन, भाजपवर टीका करत, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच यावेळी त्यांनी शुभम शेळके यांची भेटही घेतली.
यावेळी पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी, “भाजप पाच वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होता, त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप, मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी येथे येऊन केले,” असा हल्लाबोल त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर केला.
तसेच त्यांनी, “देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खुश करण्यात व्यस्त असतात, दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रातही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. करोना असेल, राज्यातील बाकी मागण्या असतील, त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेतली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही,” अशी टीकाही फडणवीसांवर केली.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली असून, भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला.