उस्मानाबाद : राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत चालली असताना, दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर झाल्यामुळे वसंतदादा शूगर इस्न्टिट्यूटचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजननिर्मिती करण्याच्या सुचना साखर आयुक्तालयाला केल्या होत्या. त्यांच्या या आवाहनाला यश मिळाल्याचे दिसून येत आहे. लवकरच उस्मानाबाद येथील कारखान्यात ऑक्सिजननिर्मितीचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे.
साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट स्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात लवकरच सुरू होणार आहे. धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट राबवणारा धाराशिव साखर कारखाना हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. शरद पवारांच्या आवाहनानंतर कारखान्याने हा निर्णय घेतला आहे.
धाराशिव साखर कारखाना प्रति दिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहेत.