शिवसेनेला टार्गेट कराल तर मी कुणालाही सोडणार नाही, तसेच राष्ट्ररवादीबद्दल मी आता लवकरच सविस्तर बोलणार आहे, असा इशारा शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.
ग्रामपंचायतीचे सव्वा दोन कोटी रुपये राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेने अडविला होते. ते मिळविण्यासाठी तब्बल दोन महिन्यांची लढाई आढळराव यांच्या ग्रामपंचायतीने लढली. गेली दोन महिने एक सारखी तक्रारपत्रे पुढे करुन पुणे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला हैराण केल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात महाआघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी या दोन पक्षांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
‘राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तीन पक्षांचे महाआघाडी सरकार असताना पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका ग्रामपंचायतीला टार्गेट करुन तेथील सव्वा दोन कोटी रुपयांची कामे रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्या-ज्या पदाधिका-यांनी हे उद्योग केले ते पुराव्यांसह आपल्याकडे आहेत’, असेही ते म्हणाले आहेत
शिक्रापूर येथील रस्ता व गटारलाईनची सुमारे दोन कोटी दहा लाखांची मंजुर कामांच्या निविदा प्रक्रीया दोन महिन्यांपूर्वी सुरू होण्याच्या दरम्यानच या कामांच्या ऑनलाईन निविदा प्रक्रीयेत काही तांत्रिक चुका काढण्यात आल्या. या कामी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लेखी अर्ज करुन प्रशासनाला हैराण केल्याची तक्रार शिक्रापूर सरपंच हेमलता राऊत व उपसरपंच रोहीणी गिलबीले यांनी आढळराव यांच्याकडे केली होती. पक्षीय पातळीवर हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत आढळराव यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या सर्व प्रमुख अधिका-यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे केली. याबाबत केवळ शिवसेनेची ग्रामपंचायत म्हणून अडचण कुणी करीत असेल तर मी स्वत: आंदोलनात उतरेन आणि हा प्रकार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत घेवून जाईन असा इशारा दिला. या साऱ्या प्रकारामुळे आढळराव काय बोलणार याकडे आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय मंडळींचे लक्ष आहे.