पाटणा : काही दिवसांपुर्वीच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत 125 जागा मिळत स्पष्ट बहुमत मिळवले होते. यामध्ये भाजपला 74, जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या. जेडीयूपेक्षा भाजपला अधिक जागा असल्या तरी आधीच ठरलेल्या सुत्रानुसार जेडीयूच्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र आता नितीश कुमार यांनी आपल्यावर मुख्यमंत्रीपद स्विकारण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा केल्यानंतर बिहारच्या राजकारणात वादळ आले आहे.
जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नितीश कुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असा दावा त्यांनी केला आहे.
दबावामुळे मी मुख्यमंत्री झालो. कोणालाही मुख्यमंत्री बनवा. कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केले तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाही, असे वक्तव्य नितीश कुमार यांनी बैठकीत केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
विधानसभा निकालानंतरच भाजपच्या सर्वाधिक जागा असल्याने त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद स्विकारल्यानंतर देखील हे सरकार लवकरच पडेल, असा दावा सातत्याने केला जात आहे. यातच आता नितीश कुमारांनी केलेल्या या वक्तव्याने बिहारमधील राजकारण तापले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना, नितीश कुमार यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री का केलं जाईल? भाजपकडून होणाऱ्या अपमानामुळे मुख्यमंत्री दु:खी आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते राकेश राठोड यांनी लगावला आहे.