कोरोनाचे संकट राज्यावर असतानाच याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाला असून अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. त्यापार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षेवरुन कोणीही राजकारण करु नये. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
मुलांच्या परीक्षेबाबत पालकांनी चिंता करु नये, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असेही सामंतांनी यावेळी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ दौऱ्यावर होते. त्यांनी, ‘कोरोनाच्या संकटामध्ये परीक्षा घेणं शक्य नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारला परीक्षा घ्यायच्या नाहीत, हा समज चुकीचा आहे. अचानक कोरोनाचं संकट दूर होणार आहे का? युजीसीने सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा. रेड झोनमधील विद्यार्थी येऊन परीक्षा कशी देऊ शकतात, ते युजीसीने सांगावे,’ अशी भूमिका स्पष्ट केली.
‘कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. राज्यातील सर्व कुलगुरुंशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रश्नपत्रिका तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणं हे काम काय रोबो करु शकणार नाही. त्यामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेणं शक्य नाही,’ असे उदय सामंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले