मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना वाढीव वीज बिले आली आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये सापडलेल्या सर्वसामान्यांना वाढीव वीज बिल आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. ज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले होते. यावरून भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
या टीकेला नितीन राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून, भाजप सरकारच्या काळातच काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोचली होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढुन ऑक्टोबरमध्ये 59,102 कोटींवर पोचली. मार्च 20 ला घरगुती ग्राहकांकडे असलेली 1374 कोटींची थकबाकी ही 4824 कोटींवर पोचली.वाणिज्य ग्राहकांची 879 वरून 1241 कोटींवर तर औद्योगिक ची 472 वरून 982 कोटींवर पोचली
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) November 18, 2020
नितीन राऊत यांनी ट्विट करत आरोप केला की, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोचली.
कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढुन ऑक्टोबरमध्ये 59,102 कोटींवर पोचली. मार्च 20 ला घरगुती ग्राहकांकडे असलेली 1374 कोटींची थकबाकी ही 4824 कोटींवर पोचली.वाणिज्य ग्राहकांची 879 वरून 1241 कोटींवर तर औद्योगिक ची 472 वरून 982 कोटींवर पोचली, अशीही माहिती त्यांनी ट्विट करत दिली.
दरम्यान, लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.