मुंबई : ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे इडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ? अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींवर टीका केली आहे.
खरंतर, गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याचं समोर येत आहे. हल्लीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. यावर बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
भाजपचे लोकप्रतिनिधी गंगास्नान करून आले आहेत का?
भाजपचे लोकप्रतिनिधी गंगास्नान करून आले आहेत का? त्यांच्यावर कारवाई का नाही? असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरून चालतं आहे. ते पंतप्रधान कार्यालयातून चालत नाही असं दिसतं. गैरफायदा घेणारं हे पहिलं सरकार आहे. हातातल्या बाहुलीप्रमाणे इडीला नाचवलं जात आहे.’
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप नेत्यांसह ईडीवरही टीका केली आहे. ‘ईडीच्या प्रमुखांना काही इमानी इभ्रत काही जिवंत असेल आणि भारताचे नागरिक असाल तर त्यांनी सांगा की ते मोदीचे गुलाम आहेत की भारतीय घटनेचे अधिकारी आहेत? एका तरी भाजपच्या नेत्यावर, आमदारांवर चौकशी झाली असेल असे एखादे उदाहरण सापडलं नाही. हे सर्व गंगास्नान करून आलेत का? याच्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्येदेखील इतका अतिरेक झाला नाही याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल’ असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
दरम्यान, ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे हे चालूच राहणार. मात्र, याचा परिणाम कुठे होणार नाही. हे सर्व मुरब्बी राजकारणी आहेत. हे भांडताना दिसत असले तरी त्याचा काही फरक पडणार नाही. सत्तेवर तेव्हा त्या बाहेरच्या लोकांवर त्याचा काही परिणाम होणार नाही असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
‘मी पण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी याचा समर्थन करतो. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बरेचसे तंटे होत असतात. रोहित पवार असो किंवा इतर ज्याने कोणी पैसे देण्याची घोषणा केली आहे. त्याच्या मागचा उद्देश निवडणुकीदरम्यान तंटे होऊ नये असा आहे.
एखाद्याने जर 25 लाख रुपये किंवा पैसे देऊ केले तर त्याला विरोध करण्यासाठी काही कारण नाही. रोहित पवार यांनी असे कुठेही म्हटलेले नाही. तर राष्ट्रवादीसाठी मतदान करा महाविकास आघाडीला मतदान करा असं कुठेही म्हटलेले नाही. त्याच्यामुळे यात वाईट काय आहे असंही स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं आहे.
Read Also :
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला…
“छगन भुजबळ आणि वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
“संजय राऊत यांच्या कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा”; किरीट सोमय्या यांची मागणी
खासदाराच्या उपस्थितीच शिवसैनिकाची पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण