अमरावती : लॉकडाऊनमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून वाद चालू आहेत. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परिक्षा रद्द करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या निर्णयांमध्ये फरक असल्याने यावर अंतिम निर्णय अजून होऊ शकला नाही. यातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याने उदय सामंत यांना धमकी देण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
मीळालेल्या अधिक माहितीनुसार उदय सामंत सध्या अंतिम वर्षांच्या परिक्षांबाबत आढावा बैठका घेत आहेत. त्यासाठीच ते सर्व विद्यापीठांमध्ये जात आहेत. सध्या ते अमरावती विद्यापीठात बैठक घेण्यासाठी गेले होते. ती बैठक आटोपून ते नागपूर विद्यापीठाला जात होते. दरम्यान ABVP च्या पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत यांना फोन करून ‘नागपूरला पोहचू देणार नाही’ अशी धमकी दिली. अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरत नसून याबद्दल लवकरच तक्रार दाखल करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.