गेल्या काही दिवसांपासून फेसबुकचा अनेक राजकारणी मंडळींकडून सोप्या पद्धतीने प्रसिद्धीसाठी वापर केला जात आहे. मात्र बहुतांशी प्रमाणात हा वापर एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी होताना दिसून येत आहे. याच अनुषंगाने फेसबुक आणि व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या वापराबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे.
फेसबुकसारख्या माध्यमांवर वाद-प्रतिवाद व्हायला हरकत नाही, पण द्वेष पसरवून देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग-व्यवसायातले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही !
गेल्या अनेक दिवसांत सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचे अनेक प्रकार देखील झाल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हंटले आहे. तसेच फेसबुक आणि व्हाट्सअप हे भाजप व संघाच्या नियंत्रणाखाली असून त्यांनी या माध्यमांतून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला असल्याचा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे.
देशातील फेसबुकच्या व्यवसायावर भाजपचे नियंत्रण असल्याचे देखील या अग्रलेखाद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर देखील सोशल मीडियावर अनेकांनी स्वतःचा कायदा लागू केल्याचे सामनामधून सांगण्यात आले आहे. एकूणच सध्याचा सोशल मीडिया आणि त्याचा सत्ताधाऱ्यांकडून होणार वापर यावरून सामनाच्या अग्र्हलेखातून जोरदार हल्ला करण्यात आला आहे.