मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 23 ऑक्टोबर रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जाताजाता त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपला पक्षावर राग नसून, फडणवीसांनी माझं आयुष्य उद्धवस्त केलं त्यांच्यामुळेच पक्ष सोडत असल्याचे ते म्हणाले. यातच आता भाजप खासदार नारायण राणेंचे एक जुने ट्विट सध्या व्हायरल होत आहे.
एका बाजूला एकनाथ खडसेंना क्लीनचीट दिल्याचे मुख्यमंत्री सांगतात, दुसऱ्या बाजूला दिल्लीत जाऊन खडसेंचा राजीनामा घ्यायची विनंती करतात.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 4, 2016
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतल्याचे, राणे यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नारायण राणेंनी हे ट्विट 2016 साली खडसेंनी आपल्यावरील आरोपानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी केलेले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून भाजपमध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला एकनाथ खडसेंना क्लीनचीट दिल्याचे मुख्यमंत्री सांगतात, दुसऱ्या बाजूला दिल्लीत जाऊन खडसेंचा राजीनामा घ्यायची विनंती करतात. या सरकारमध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांना आतापर्यंत टार्गेट करण्यात आले आहे, असे दिसून येते, असे ट्विट राणेंनी त्यावेळी केले होते. आता खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हे ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे.