डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहाची दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच घरातील कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याबद्दल संताप व्यक्त केला आहे. ‘राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही.’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
“राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत. “असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2020
दरम्यान, बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. मंगळवारी सायंकाळी येथे तोडफोड झाली.