बीड : पीक विमा कंपन्या लोकांना मूर्ख बनवत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो तरी दहा हजार कोटींचे पॅकेज दिले होते. आम्ही केंद्र सरकार मदत देणार म्हणून वाट बघत बसलो नाही, याची आठवण फडणवीसांनी करुन दिली. लातूर जिल्ह्यात बियाण्याचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जात आहे. हे बियाणे आहे का म्हाडाची लॉटरी पद्धत. शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे का?, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्याच्या तिजोरीतून आता तातडीने मदत करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि परत या वर्षी आतिवृष्टी झालीय. अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. ज्या ठिकाणी ऊस पडला आहे हे निकषात बसत नाही असे सांगितले जात आहे. निकषात बसत नाही असं म्हणून कसं चालेल. नियमात बसत नसेल तर नियम बदलले पाहिजेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला उद्देशून सांगितलं.
“मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमधील काही गावांचा दौरा केला. असा धावता प्रवास करुन काही होणार नाही. खूप ठिकाणी जाऊन लोकांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री व्हायचं असतं कारण जे वाटतं ते तिथल्या तिथे निर्णय जाहीर करुन प्रशासनाकडून त्यांची अमलबजावणी करता आली पाहिजे. काल नाही, पण किमान आज काहीतरी मदत जाहीर करायला हवी होती जेणेकरुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, “बाकीच्यांनी प्रवासच करायचा असतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास करायचा, अश्रू पुसायचे, तुमच्या मागण्या मांडतो असं सांगायचं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासारखा प्रवास करुन काही उपयोग नाही. त्या प्रवासात काही ठोस घोषणा केल्या पाहिजेत. पुन्हा अतिवृष्टी होईल, पाहतो असं बोलायचं नसतं,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Read Also :
“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत”; चंद्रकांत पाटलांना खडसेंवर विश्वास https://t.co/zykhfbF0Lk @ChDadaPatil @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020