मुंबई : देशात सध्या कोरोनावरील अनेक लसींची चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्य नागरिकांना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आधीपासूनच लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी नियोजन करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, ज्या व्यक्तीला मेसेज येईल, त्यालाच कोरोनाची लस मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेश टोपे यांनी माहिती दिली की, कोरोना लस देण्यासाठी विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे. त्या व्यक्तीला मेसेज मिळेल. तो सेंटरवर येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल.
लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्सचा डेटा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक, शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षाखालील असा सगळा डेटा तयार करत आहोत, असेही ते म्हणाले.
18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.