मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले असून, शासन आणि प्रशासनाने त्या अनुषंगाने कठोर उपाययोजना करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने ५ एप्रिलपासून करोना प्रतिबंधक नवीन नियमावली जाहीर केली आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांना करोना लस टोचवून घेण्याचे आवाहन देखील सरकारकडून केले जात आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून लसींच्या राज्य सरकारला होणाऱ्या पुरवठ्यावरून, केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद विवाद होत आहेत. यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असून, त्यांच्या या टीकेचा समाचार राज्यातले नेते आणि केंद्रातले भाजपचे मंत्री घेत असलेले पाहायला मिळत आहे.
यातच आज भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी, करोना लसीचा महाराष्ट्राला कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याचे सांगून, राज्य सरकारवर तोंडसुख घेतले आहे. भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये लसी आहेत, पण लसी देण्याची ऑर्डर नाही आहे. ठाकरे सरकारने आता करोना काळातील प्रचंड अपयश झाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे, किती हा बेशरमपणा?, असा टोला लगावला आहे.
त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातले संबंध अजूनही या विषयावरून ताणले गेले असल्याचेच दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे ५० हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ५६ हजार २८६ रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात करोनाचे लसीकरण वाढवण्याची सातत्याने मागणी, राज्य सरकारकडून होत आहे.