मुंबई: विधानसभेत भाजपच्या १२ आमदाराचं निलंबन करण्यात आलं. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी भास्कर जाधव हे नरकासुर असून सोंगाड्या आहेत, अशी टीका केली होती. या भास्कर जाधव यांनी आपल्यावर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. भास्कर जाधव म्हणाले की, मी फडतूस माणसांविषयी बोलत नाही आपण जास्त काही बोलत नाही.
भास्कर जाधव यांच्यावर नितेश राणे यांची टीका
१२ आमदारांचं निलंबन झाल्यापासून भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. आम्ही कोकणातले आहोत जाधवही कोकणातले आहेत. दशावतार असतात कोकणात. त्यात नरकासुर असतो. तो वेगवेगळे सोंग बदलतो. सोंगाड्याही असतो त्यात. जे जे भास्कर जाधवला ओळखतात त्याना माहीत आहे ते सोंगाड्या आहेत. ते नरकासुरासारखे आहेत. ते एकच सोंग कधीही ठेवत नाही. काल त्यांना कोणीही शिवी घातली नाही. कोणीही काहीही केलं नाही. पण तमाशातील सोंगड्या कसा असतो, नरकासुर कसा असतो. तसे हे भास्कर जाधव आहेत. आमच्या सारखे लोक त्यांना चांगलं ओळखून आहे. ते काय काय करतात ते आम्हाला माहीत आहे, असं सांगतानाच तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान एका सोंगाड्या माणसाने केला आहे. त्यांना काहीही झालं नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले का नाही? त्यांनी स्वत:चे कपडे का नाही फाडून घेतले. माझे बंधू निलेश राणे त्यांना चांगले ओळखतात, असं नितेश राणे म्हणाले.
भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण १२ सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.