मुंबई : लोक माझ्यावर टीका करतात की मी घराबाहेर पडत नाही म्हणून, मात्र माझ्या सहकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. सहकारी म्हणायचं आणि त्यांचे फोन टॅपिंग करायचे याची मला गरज नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले आहे. सरकारच्या वर्षपुर्ती निमित्ताने ते एका कार्यक्रमात बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्य सरकारने ‘महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही’ पुस्तिका प्रकाशित केली आली. यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते. सहकारी म्हणायचे आणि त्यांचे फोन टॅपिंग करायचे याची मला गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे देखील भरभरून कौतुक केले. शरद पवार, सोनिया गांधी या सर्वांचे आशिर्वाद आहे. त्यांच्या आयुष्यावर एखादे पुस्तक तयार करायला हवे, जे येणाऱ्या नवोदित राजकारण्यांना मार्गदर्शक ठरेल.
अनेक जणांना असं वाटत होते. हे सरकार होऊच शकणार नाही. आपल्या मागे फरफटत येणारच. पण शिवसेना कधी फरफटत जाणाऱ्या पक्षासारखी नव्हती, आधी नव्हती आणि आताही नसणार आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला देखील टोला लगावला.