सांगली – जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना हे वक्तव्य केले होते. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.
यावेळी पाटील यांनी तरूणांना राजकीय यशाचा कानमंत्रही दिला. तरूणांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी फक्त पोस्टरबाजी करून चालणार नाही. त्यांना जनतेत उतरून काम करावं लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.