सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राज्य सरकारकडून पुढील पर्यायांबाबत विचार केला जात आहे. तर दुसरीकडे आता भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी राज्यभर दौरा करत आहेत.
यातच ‘राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन’, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. ते सोलापुरात पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच, 27 मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर भेट घेऊन आरक्षणाबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read Also :