नागपूर : विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या राज्यपाल नियुक्त जागांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मंद गतीचे झाले असून, राजभवनात कोणतं भूत आहे? विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फायली कोणत्या भुताने पळवून नेल्या?, अशी टीका त्यांनी सामना अग्रलेखातून केली होती. त्यांच्या या टीकेबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी राऊतांना कामधंदा नाही, असे म्हणत यावर बोलणे टाळले.
फडणवीसांनी राऊत यांच्या राज्यपालांवर केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधाने आहेत. हा निव्वळ पोरखेळ आहे. असा पोरखेळ कुणीही करू नये, असा टीका त्यांनी लगावला.
संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीबाही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असा जोरदार टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, राज्यपालनियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी ‘सामना’तून जोरदार टीका केली होती. राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले होते.
Read Also :