पिंपरी चिंचवड – ‘आपल्या देशात उत्पादन केलेल्या लशीबाहेर देशात पाठवायची गरज नव्हती, त्या असत्या तर बरंच लसीकरण पार पडलं असतं, किमान आता जेवढ्या लशी बाहेर दिल्या त्या तरी परत आणाव्यात, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर केली.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
‘केंद्र सरकारच्या कारभारावर जगभतील माध्यमांकडून टीका होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात उत्पादन केलेल्या लशीबाहेर देशात पाठवायची गरज नव्हती, त्या असत्या तर बरंच लसीकरण पार पडलं असतं. सुरुवातीला आपल्या देशात तयार झालेली लशी परदेशात द्यायची गरज नव्हती, आता आपल्याला तुटवडा भासला नसता, असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
तसेच ‘आजपासून 18 वर्षाच्या पुढे लसीकरणाची सुरुवात होतेय. अनेक वेगवेगळ्या मागण्या होत आहेत. राज्य सरकारने 12 कोटी लशी विकत घेण्याची तयारी केली आहे. सीरम संस्था आणि भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासाठी तयार आहे’, असंही अजित पवारांनी सांगितलं.
‘उच्च न्यायालयाने पण लशीच्या किंमतीच्या बाबत निकाल दिला आहे. किंमती कमी करण्यासंदर्भात काही कंपन्या मागणी करत आहेत. आता एकदाच लस घेतली तरी चालते अशी बातमी आली आहे. सगळंच नवीन आहे, त्यामुळे नक्की काही समजत नाही. जे नवीन आहे त्याची माहिती घेतली जात आहे, असंही अजित पवारांनी सांगितले.