मुंबई: भाजप ठरवणार, भाजप मागणी करणार, भाजपची लोकं निर्णय घेणार, भाजपची लोकं लोकांना अटक करणार, लोकांना दंड ठोठावणार, ही लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आम्ही बोलू तोच कायदा, आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही, अशा शब्दात नवाब मलिक केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केलीय. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
भयाचं वातावरण निर्माण करायचं, लोकांवर राजकीय दबाव आणायचा, असा प्रयत्न भाजप देशभरात करत आहे. परंतु त्यांचं बंगाल मॉडेल फेल ठरलं आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रातही बंगाल मॉडेल राबवायची भाजपची इच्छा असेल तर जरुर राबवावं. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही, असा इशाराही मलिक यांनी भाजप नेत्यांना दिलाय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला
दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा असं सूचित केलं आहे. मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. तो विषयही प्रलंबित आहे. तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असं सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे. याची आठवणही मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करुन दिली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच. पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा, असा विनंतीवजा आग्रह मलिक यांनी राज्यपालांना केलाय.