मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची आणि नेत्याची विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमिवर महत्वाची बैठक पार पडली आहे. यावेळी बैठकीत पावसाळी अधिवेशनातील मुद्दे, महामंडळ वाटप, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, अनिल देशमुख ईडी चौकशी आदी प्रकरणावर चर्चा झाली. तसेच माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्र्यांमध्ये जवळपास २ तास चर्चा झाली.
प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री नवाब मलिक यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या संघटनवाढीबाबत चर्चा झाल्याचं मलिक यांनी सांगितलं. त्याचबरोबर महामंडळ वाटप, विविध शासकीय कमिट्यांवरील नियुक्तांबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनानंतर केला जाईल. त्यासाठी महाविकास आघाडीतील तिनही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील असं मलिक यांनी सांगितलं.
विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. मात्र, सर्व आमदारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल, असं मलिक यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. तिनही पक्षात समन्वयाने काम सुरु आहे. भाजप संभ्रम निर्माण करण्याचं काम करतेय. त्यांच्या बोलण्यात कुठलंही तथ्य नाही. पावसाळी अधिवेशनात भाजपच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देण्यासाठी तयार आहोत, असा इशाराही मलिक यांनी भाजप नेत्यांना दिलाय.
महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय मंत्री व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत चर्चा झाली.#NCP #Meeting pic.twitter.com/0XgzMLj3UI
— NCP (@NCPspeaks) June 29, 2021
शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरेंचीही बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यावर आता पडदा पडल्याचं सांगितलं जात आहे. कारण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांच्या फेऱ्या मारल्यानंतर आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत जवळपास १ तास चर्चा झाली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा सुसंवाद सुरु झाल्याचं आता बोललं जात आहे. तर दुसरीकडे पवार आणि ठाकरे यांच्या बैठकीत तीन महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यात महामंडळ वाटप, कोरोना स्थिती आणि निर्बंध, विधानसभा अध्यक्ष निवडणूक या मुद्द्यांचा समावेश होता.