मुंबई : राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्णांची नोंद होत असल्यामुळे, राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर, आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची राज्य सरकारकडून अंमलबजावणी सुरु असून, राज्यात ५ एप्रिपासून नवीन करोना प्रतिबंधक नियमावली लागू केली गेली आहे. परंतु, या नियमावलीमुळे सामान्य जनतेचे जीवनचक्र पुन्हा मंदावले असल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे.
दरम्यान, अशी परिस्थिती एकीकडे असताना, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसींना घेऊन, राज्य आणि केंद्रात जुंपलेली, गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे. केंद्रातील नेत्यांकडून, तसेच राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून, राज्य सरकारच्या गलथान कारभारावर सडकून टीका होत आहे, तर राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार हे या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवून, ‘महाराष्ट्राला लसींच्या पुरवठ्याच्या बाबतीत केंद्राकडून अशी वागणूक का?असा सवाल करत आहे.
यातच आज, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, माध्यमांशी संवाद साधताना, मुंबईतही अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्यानं लसीकरण थांबवण्यात आलं असून, मुंबईत केवळ एक दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली आहे. तसंच, “आज मुंबईला ७६ हजार ते १ लाख लसींच्या डोसचा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळत असली, तरी ती अधिकृत आहे की नाही, याबद्दल साशंक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.