मुंबई : करोनाची पहिली लाट, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, दिशा सालियन, मोहन देलकर, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन मृत्य प्रकरणे, सचिन वाझे-एन्टीलिया स्फोटकं प्रकरण, परमबीर सिंग ‘लेटरबॉम्ब’ आणि त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आलेले नाव या सर्व प्रकरणांमुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला कुठेतरी तडा गेलेला आहे.
यातच आता पुन्हा डोके वर काढलेल्या करोनाच्या संकटामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. परिणामी बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका आणि आरोप करत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘खरचं हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!! अशा धृवपदाची एक कविता तयार करून, त्यांनी कवितेतून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांची ही कविता उपरोधिक शैलीत असून, ती त्यांनी फेसबुकवर शेअर देखील केली आहे.
खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…
खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही…
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले …
निर्णय घेताना घेतले
विश्वासात…
विरोधकांचे त्यामुळेच
फावले……
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!
मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले…
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले…
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!
इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या…
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!
ना कुठे बडबोलेपणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको…
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव……
जे करतोय ते प्रामाणिकपणे
तो करतो आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!
व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय…
गोरगरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय…
निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ……
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!
ना क्लीन चिट देता आली…
ना खोटी आकडे वारी देता आली…
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!
महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
उठसूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय…
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!
– डॉ.जितेंद्र आव्हाड