भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असतानाच आता इराणने देखील भारताला मोठा झटका दिला आहे. इराण आणि भारत यांच्यात चार वर्षांपूर्वी झालेल्या चाबहार रेल्वे प्रकल्पाबाबत करारातून इराणने भारताला वगळले आहे. ‘द हिंदू’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
चार वर्षांपूर्वी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचा दौरा केला होता. तेव्हा हा करार भारत-अफगाणिस्तान आणि इराणमध्ये झाला होता. तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष रुहाणी, अफगाणिस्तानचे अध्यक्ष घणी आणि आयआरसीओएन यांच्यात चाबहार रेल्वे मार्गाच्या योजनेबाबत करारावर स्वाक्षरी केली होती. इराणी रेल्वे मंत्रालयासोबत झालेल्या या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या करारात भारताकडून इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेडचा (IRCON)सहभाग होता.
‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, भारताकडून या प्रकल्पासाठी निधी मिळण्यास विलंब होत आहे, परिणामी आम्ही स्वत:च यावर काम करण्यास सुरुवात केली आहे, असे इराणचे मत आहे. 628 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग बांधण्याचं काम मागील आठवड्यात सुरु झाले आहे. इराणचे वाहतूर शहरी विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी याचे उद्घाटन केले . हा रेल्वे मार्ग सीमा पार करुन अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जातो.
दरम्यान इराण आणि चीनमध्ये 25 वर्षांच्या रणनीती करारावर चर्चा झाली आहे. सुमारे 400 अब्ज डॉलरचा करार असेल. मात्र इराणच्या संसद मजलिसकडून याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या करारानुसार, चीन अतिशय कमी दरात पुढील 25 वर्षांपर्यंत इराणमधून तेल खरेदी करणार आहे. या मोबदल्यात चीन बँकिंग, दूरसंचार, बंदर, रेल्वे आणि वाहतूक इत्यादी सेवांमध्ये गुंतवणूक करणार आहे.