मुंबई : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे. वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना सरकसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. अकरावी प्रवेशासाठी पुढील काळात ऑनलाईन सीईटी आयोजित केली जाणर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
“राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं आरोग्य हेच सरकारचं प्राधान्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलवणं योग्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारनं याआधीच घेतला आहे. पण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे प्रत्येक विषयानुसार होणार असून त्यासाठी प्रत्येक विषयाला १०० गुणांच्या आधारावर मूल्यमापन केलं जाणार आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
दहावीचा निकाल कसा लावणार?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना ९ वी व १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय ८ ऑगस्ट २०१९ नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा १०० गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष २०२०-२१ साठी इ.१० वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
- विद्यार्थ्यांचे इ १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण देण्यात येतील.
- विद्यार्थ्यांचे इ १० वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण देण्यात येतील.
- विद्यार्थ्यांचा इ. ९ वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दहावीचे निकष जाहीर करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे. ती म्हणजे गतवर्षी नववीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात आला होता. विद्यार्थ्यांची ही माहिती सरल पोर्टलवर उपलब्ध आहे.
इयत्ता ११ वीच्या परीक्षेसाठी वैकल्पिक प्रवेश परीक्षा
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असलं तरी शाळांद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यमापनावर विद्यार्थी नाखुश असतील तर त्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी पर्याय म्हणून सामाईक परीक्षा (सीईटी) देता येणार आहे.
निकालाबाबत समाधानी नसणाऱ्या विदयार्थ्याना दोन संधी
2020-21 चा दहावीचा निकाल कोरोना संसर्गामुळे नव्या निकषांच्या आधारे लावण्यात येणार आहे. निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. या निकषानुसार मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्यांना मान्य नसतील त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दोन संधी उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य
इयत्ता १० वीचा निकाल मूल्यमापनानं लागल्यानंतरही ११ वीच्या परीक्षेसाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर उर्वरित जागांवर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.