मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने प्रसिद्ध विधिज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी घोषीत केली आहे. विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी निकम यांची वर्णी लागली आहे. याआधी भाजपने मुंबईतील दोन असे एकूण तीन विद्यमान खासदारांचा पत्ता केला आहे. त्यामुळे विरोधकांकडून यावर आता जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. यानंतर उज्वल निकम यांनी मुंबईचे शहाराध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावर आता भाजप पक्षातच का प्रवेश केलाय. यावर उज्वल निकम यांनी सविस्तर उत्तर दिलंय.
उज्वल निकम म्हणाले की, मुळात राजकारण हा माझा प्रांत नाही, या मतावर मी आजही ठाम आहे. कारण आयुष्याची आजपर्यंतची सर्व कारकिर्द वकिली व्यवसायामध्ये व्यतीत केली आहे. त्यामुळे राजकारण हा माझा पिंड नाही. तरीही मला राजकारणात येण्याबाबत अनेकदा विचारणा करण्यात आली होती, हेही वास्तव आहे. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून गेल्या निवडणुकीच्या वेळी मला उमेदवारीसाठी खूप आग्रह करण्यात आला होता; पण मी तेव्हा नम्रपणाने नकार दिला. माझ्या आजच्या निर्णयामुळे सर्वांत पहिला धक्का त्यांना बसला असेल यात शंका नाही.
हेही वाचा…“महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खंबीरपणे साथ द्या”, महादेव जानकरांचं मोठं आवाहन
भाजपमध्ये प्रवेश का केला ? यावर बोलतांना निकम म्हणाले की, “वकिली क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट खटला हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा किंवा टर्निंग पॉईंट ठरला. या खटल्यानंतर मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट असोत किंवा २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला असो विविध केसेस मी लढवल्या. न्यायप्रक्रियेतील सर्व आयुधे वापरुन या खटल्यातील संबंधित गुन्हेगारांना कठोरातील कठोर शासन होईल. यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजमल कसाब सारख्या भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालण्याच्या इराद्याने आलेल्या दहशतवाद्याला फासापर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण हे खटले लढत असताना मला तत्कालीन राजकीय व्यवस्थेतील उणिवा, कमकुवतपणा स्पष्टपणाने जाणवत होता. ”
गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी ठेवत दहशतवादाविरोधात जी कठोर पावले उचलली. त्यामुळे मी प्रभावित झालो. टेरर अँड टॉक एकाच वेळी होणार नाही, ही कणखर भूमिका घेतानाच देशातील लष्कराला मुक्त हस्त देत त्यांच्या सक्षमीकरणातून काश्मीर खोर्यासह देशातील राष्ट्रविरोधी तत्वांचा बिमोड करण्यामध्ये या सरकारने मिळवलेले यश हे अनन्यसाधारण आहे. दहा वर्षांमध्ये देशात एकही बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला न होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. दहा वर्षांपूर्वीचा काळ आठवून पहा, पुणे, मुंबई यांसारख्या देशातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करुन पाकिस्तानने भारतीयांच्या मनावर एक भीतीचे सावट निर्माण केले होते. असेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा…“पुण्याच्या आरोग्य सुविधांना मिळतोय मोठा बूस्टर “-मुरलीधर मोहोळ
देशातील स्लीपर सेल्सची संख्या वाढत चालली होती. पण तत्कालीन राजकीय व्यवस्था पाकिस्तानविरोधात ठोस भूमिका घेण्याऐवजी फुटिरतावाद्यांसमोर गुडघे टेकताना दिसत होती. याउलट मोदी सरकारने पुलवामा असेल, उरी असेल या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला जरब बसवला. जागतिक पटलावर पाकिस्तानची कोंडी केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज भारताच्या आर्थिक विकासाचे गोडवे जगभरात गायले जात आहेत आणि पाकिस्तान भिकेकंगाल झाला आहे.असेही त्यांनी आर्वजून सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, केवळ पाकिस्तानचे कंबरडे मोडून हे सरकार थांबले नाही; तर आज भारताचे इस्लामिक देशांसोबतचे संबंधही कमालीचे सुधारले आहेत. त्यामुळेच कतारसारख्या देशातील न्यायालयाने भारताच्या ८ माजी नौदल अधिकार्यांना फाशीची शिक्षा सुनावूनही राजनयाचा सुरेख वापर करत तेथील राजाच्या अधिकारांतर्गत या आठही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. कलम ३७० आणि ३५ अ रद्द करुन काश्मीरच्या नंदनवनात विकासाची गंगा नेण्याचे काम या सरकारने केले. पंजाबमधील खलिस्तान्यांचा उद्रेक असो, चीनचे आव्हान असो किंवा पाकिस्तानला दिलेला शह असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देश सुखरूप, शांततेचे जीवन जगत आहे. येणार्या काळात ‘विकसित भारता’चे उद्दिष्ट ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली आहे. या विकासाच्या यात्रेमध्ये प्रत्येकाने आपापले योगदान द्यायचे आहे. त्या उद्देशाने मी ही उमेदवारी स्वीकारली आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात अजूनही पवार अन् ठाकरेंची सहानुभूती,” छगन भुजबळांनी घेतला युटर्न, म्हणाले…
हेही वाचा…“ठाकरेंना आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, तटकरेंनी ठाकरेंना सुनावलं
हेही वाचा…“मात्र आता त्याच दादांना खलनायक ठरवलं जातंय”, धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“शिरुर लोकसभा मतदारसंघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत”