मुंबई : महाविकास आघाडीचा वंचितविना जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसापासून वंचितने महाविकास आघाडीबाबत जहाल भूमिका घेतली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याने वंचितविना महाविकास आघाडीने फॉर्म्युला तयार केल्याची माहिती समोर येत आहे. जागा वाटपाचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या जागावाटपाचा ठाकरे गट मोठा भाऊ झाला आहे. राज्याच्या ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ठाकरे गटाला सर्वाधिक २२ जागा देण्यात आल्या आहेत. तर शरद पवार गट १० आणि कॉंग्रेसच्या वाट्याला १६जागा निश्चित झाल्या आहेत. यातच ठाकरे गटाकडून हातकणंगलेची जागा ही राजु शेट्टी यांना सोडली जाऊशकते तर महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देईल अशी चिन्ह दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला सांगली आणि कोल्हापुर जागेवरून ठाकरे आणि कॉंग्रेसमध्ये अदलाबदली केल्याची शक्यता आहे.
वंचितकडून महाविकास आघाडीला तब्बल १७ जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु महाविकास आघाडीला तो मंजून नसल्याचं समजत आहे. यातच महाविकास आघाडी वंचितसाठी चार जागा सोडण्यास तयार आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.