मुंबई – पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. भारत भालकेंच्या निधनानं मंगळवेढ्यात विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापासूनच काही जणांचे नावं चर्चेत आहेत. त्यात आज (27 डिसेंबर) पहिल्यांदा अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आलंय. पार्थ पवारांनी मंगळवेढ्याची पोटनिवडणूक लढवावी अशी मागणीही राष्ट्रवादीच्या हितचिंतकांनी केलीय.
पार्थच्या उमेदवारीवर अजून तरी राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया देणारे जयंत पाटील हेच सर्वोच्च नेते आहेत. शरद पवार किंवा अजित पवार यांनीही याबाबत वक्तव्य केलेलं नाही. सोलापुरात एका स्थानिक वर्तमानपत्रात एक काल्पनिक राजकीय सदर छापून आल्यानंतर पार्थच्या उमेदवारीची चर्चा रंगलीय.
दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी ही मागणी केली होती.