सिंधुदुर्ग : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना 2018 सालच्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. अद्याप गोस्वामी यांना जामीन मिळालेला नाही. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केला जात आहे. मात्र यातच आता आधीच्या सरकारने अन्वय नाईक प्रकरण दाबले असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की,अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेली अटक पत्रकारीतेशी संबंधित नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव आहे. ते एकटेच नाही, तर आणखी दोघांची नावं त्यात आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पूर्वीच्या सरकारनं हे प्रकरण दाबलं होतं. पूर्वीच्या सरकारच्या काळात गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. खरे तर गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारवर केला आहे.
याप्रकरणात राज्य सरकारचा काहीही हस्तक्षेप नाही. कायदा सर्वांना समान असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.