पुणे – ( पराग पोतदार )
या सगळ्याची सुरुवात झाली सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर. आत्महत्या की खून या वादात अभिनेत्री कंगना राणावत हिने उडी घेतली तेव्हा ती धाडसी आणि बेधडक म्हणून चांगली वाटली होती. पण बेधडकपणा आणि बेतालपणा यात अंतर फार कमी असतं. पुढे तसंच झालं. मुंबईच्या संदर्भात वक्तव्य करताना कंगना घसरली.
ज्या मुंबईने तिला पोसले, नाव दिले, ओळख दिले त्या नगरीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करून नव्या वादाला तोंड फोडले आणि ती वाचाळवीर ठरली.
इथे कंगना भरकटली…!
त्या वक्तव्यावर लगेच माफी मागून हा विषय तिथेच संपवणे किंवा किमान त्याची धार कमी करणे शक्य होते. पण तिचा अहंकार आडवा आला.
तिच्या या असल्या वागण्या-बोलण्याचा कुठल्याही स्वाभिमानी महाराष्ट्रीयन माणसाला राग येणं स्वाभाविक होतं. कंगना विरोधात राज्यात रागाची लाट उसळली.
माध्यमांचाही फोकस लगेच बदलला.
कंगनाच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी तिला हरामखोर म्हटले आणि नव्या वादाला निमित्त मिळाले.
इथे मुख्य मुद्द्यापासून सरकार भरकटले…!
कंगनाला केंद्राने वाय सुरक्षा देऊन ‘देश की बेटी’चे रक्षण केले. मग या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आणि कंगनाचा ‘बोलविता धनी’ कुणी वेगळाच असावा असे तर्क लढवले जाऊ लागले. या प्रकरणातील मुद्द्यांपेक्षा ‘राजकारण’ अधिक गडद झाले आणि मग एकंदरीत सगळेच एकसाथ भरकटले.. !
‘किसीके बाप मे दम है तो रोक के दिखाव’ म्हणत कंगनाने आव्हान दिले. सुरक्षेसह मुंबईत दाखल झाली. त्यामुळे सरकारला नामोहरम करण्यासाठी सगळ्या विषयाच्या मागे भाजप असावा अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होऊ लागली. कंगनाची बाजू लावून धरणारी वक्तव्ये भाजप नेत्यांनी केली. मग आरोप प्रत्यारोपही सुरू झाले…
इथे मुख्य मुद्द्यापासून महाराष्ट्रातील राजकीय नेतेही भरकटले… !!
शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने कमालीची तत्परता दाखवत कंगनाचे मुंबईतील कार्यालय पाडले. त्यामुळे ही इतकी तत्परता अन्य वेळी जाते कुठे असे प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाले. कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले गेले आणि सूडबुद्धीने कारवाई झाल्याचे आरोप झाले.
आपले कार्यालय तोडले असल्याचे पाहून अंगाचा तिळपापड झालेल्या कंगनाची पुन्हा जीभ सरकली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करीत ती पुन्हा बेताल बडबडली आणि नको इतकी भरकटली…!!
हे सगळे कव्हर करणारे माध्यमकर्मी तर आपली भूमिका आणि प्राधान्यक्रम केव्हाच विसरले होते. काय दाखवायचे, किती दाखवायचे आणि का दाखवायचे याचा विधिनिषेध, तारतम्य संपल्यासारखी स्थिती झाली. रिया चक्रवर्तीला विचित्र पद्धतीने घेरून टीकेचे धनी झालेलेच होते. अति उत्साहात वाहवत जाऊन माध्यमांच्या प्रतिनिधींनी बीएमसी कर्मचारी समजून चक्क एका पोस्टमनला घेरले आणि आपले सगळीकडे यथेच्छ हसू करून घेतले!
इथे पत्रकारिताही चांगलीच भरकटली… !!
सगळ्या पातळीवरचे असे हे भरकटलेपण आपण सध्या अनुभवतोय. एकूणच कीव करावी अशी परिस्थिती आहे. तिकडे सामान्य माणूस मात्र वेगळंच अनुभवतोय. कोरोनाशी लढताना आणि उपचार मिळवताना होणारी त्याची परवड जास्त भयानक आहे. म्हणूनच हे असे वागणे आपल्याला कुठल्याच स्थितीत परवडणारे नाही. सध्याच्या गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीत तर अजिबातच नाही.
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण आणि कंगनाचे प्रकरण एका मर्यादेपर्यंत महत्त्वाचे असले आणि दुसरीकडे ग्लॅमर, इगो, पॉलिटिक्स, टीआरपी, कव्हरेज, ब्रेकिंग हेही महत्त्वाचे असले तरी माणसाच्या जिवापेक्षा नक्कीच नाही.
या घडीला महाराष्ट्रात थैमान घालणारा कोरोना रोखणे आणि एकेक जीव वाचवणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. याचे सार्वत्रिक भान जागे व्हायला हवे.
या मुख्य आव्हानापासून आणि भयावह संकटापासून भरकटणे आणि त्याकडे दुर्लक्ष करून इतर मुद्दे घेऊन चघळत बसणे अजिबातच योग्य नाही एवढे नक्की.
तेव्हा आपण कुठून कुठे चाललोय हे वेळीच पाहायला हवं. सुधारायला हवं. नाहीतर काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही.
– पराग पोतदार (संपादकीय लेखक)