मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच चर्चेत आली आहे. कंगनाने मुंबई आणि शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रबाहेत कंगनाची प्रतिमा एखाद्या रणरागिणी प्रमाणे सर्वांना वाटायला लागली आहे. त्यामुळे आता सिने वर्तुळासह राजकीय वर्तुळात देखील कंगनाच्याच नावाची चर्चा दिसून येत आहे.
कंगनाने शिवसेनेशी थेट पंगा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. एवढेच काय तर कंगनाने दाखवलेल्या या धाडसाबद्दल केंद्र सरकारने कंगनाला वाय प्लस सिक्युरिटी देखील दिली. त्यामुळे केंद्रातील भाजपचा कंगनाला मोठा पाठींबा असल्याचे दिसून आले. त्यामुळेच आता राजकीय वर्तुळात कंगना भाजपमध्ये जाणार का ? अशा प्रकारच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.
दुसरीकडे राज्यातील भाजपने कंगनाच्या मुंबई बाबतच्या विधानाचे समर्थन केलेले नसले तरी कंगनाबाबत महानगरपालिकेने केलेल्या अन्यायाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केल्याचे दिसून आले. मात्र यावेळी कोणत्याही भाजप नेत्याने कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दात केलेल्या वक्तव्याचा निषेद केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळेच कुठे तरी राज्यातील भाजप नेते कंगनाच्या कृत्यांना खतपाणी घालत आहेत का असे चित्र तयार झाल्याचे दिसून आले.
कंगना मुळात अभिनेत्री आहे आणि त्यात शिवसेनेशी कंगनाने पंगा घेतल्याने सिनेसृष्टीत कंगना किती वेळ तग धरू शकेल हे सांगणे काठीन आहे. तसेच करण जोहर सारख्या दिगज्ज निर्मात्या सहित कंगनाने सिने सृष्टीतील अनेक कलाकारांसोबत आधीच वाद केलेलं असल्यामुळे कंगना आता राजकीय कारकिर्दीला सुरुवात करेल अशी चर्चा देखील सिनेसृष्टीत जोरदार सुरु आहे. तसेच आगामी बिहारच्या निवडणुकांमध्ये देखील कंगना स्टार प्रचारक म्हणून भाजपकडून दिसू शकते अशी देखील चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये आहे.
कंगना पहिल्यापासूनच भाजप समर्थक राहिलेली आहे. राज्यातील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर उघडपणे कंगनाचा बोलवता धनी भाजप असल्याचे म्हंटले आहे त्यामुळे एकंदरीतच कंगना भाजपमध्ये लवकरच प्रवेश करेल अशा प्रकारच्या चर्च्यांना उधाण आल्याचे पहायला मिळतंय.