पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘पितामह भिष्म’अशी तुलना व्हावी, असे नेते माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर आझम पानसे आता शहर संघटना आणि पक्षीय राजकारणातून ‘बेदखल’झाले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ सत्ताधारी असलेला एकमेव पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. या पक्षाने शहराला दिग्गज नेते दिले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ‘कारभारी’नेते अजित पवार यांच्या तालमीत तयार झालेले लांडे-पानसरे म्हणजे शहराच्या राजकारणाचा कणा आहेत. शहरातील खडान्खडा ज्यांना ज्ञात आहे. असे अनुभव संपन्न नेतृत्व. एकेकाळी पानसरे आणि लांडेंच्या परवानगीशिवाय शहराच्या राजकारणातील पानसुद्धा हालत नव्हते. मात्र, परिस्थिती बदलली. आजचे शहराचे नेते आणि भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप असोत किंवा महेश लांडगे असोत. दोघेही लांडे-पानसरे यांना ‘ज्युनिअर’ आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरभरात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. या फ्लेक्सवर माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर आझम पानसरे यांचे फोटो नाहीत. शहराचे ज्येष्ठ नेते असतानाही किमान भोसरी विधानसभा मतदार संघात किंवा पिंपरी मतदार संघामध्ये लांडे-पानसरे यांचे फोटो लावणे अपेक्षीत होते, अशी भावना त्यांच्या समर्थकांमधून बोलून दाखवली जात आहे.
२०१४ मध्ये लक्ष्मण जगताप यांनी भाजपाची वाट धरली. त्यापाठोपाठ महेश लांडगे यांनीही अपक्ष विधानसभेत एन्ट्री केली. त्यानंतर शहर राष्ट्रवादीत पडझड सुरू झाली. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव पहावा लागला. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. शहराच्या विकासाला योगदान दिलेले असतानाही राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर गेली. त्यामुळे राजकीय उद्वीघ्नतेतून ‘कारभारी’ अजित पवार यांनी शहराकडे काहीसे दुर्लक्ष केले. भाजपाच्या दोन्ही आमदारांनी राष्ट्रवादी पोखरली. असे असतानाही २०१४ पासून २०१९ पर्यंत राष्ट्रवादीचा ‘आव्वाज’ जीवंत ठेवण्याचे काम माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे अशा मंडळींनी केले. आझम पानसरेही लोकसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा राष्ट्रवादीत आले.
दरम्यान, शहर संघटनेत खांदेपालट करण्याचा विचार पुढे आला. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे यांना शहराध्यक्षपदी संधी मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी निर्णय बदलला. नव्या दमाच्या अजित गव्हाणेंवर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. जुन्यांचा अनुभव आणि नव्याचा जोश सोबत घेवून काम करणार, अशी भूमिका त्यावेळी गव्हाणेंनी मांडली. मात्र, भाजपातील नाराजांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीतील ‘कट्टर’नेत्यांकडे दुर्लक्ष केले. माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे निवडणूक प्रभारी आणि प्रवक्तेपदाची धुरा सोपवण्यात आली. राष्ट्रवादीचा कारभार गव्हाणे आणि बहल यांच्यापुरता केंद्रीत झाला. त्याला भाजपातील नाराजांची भर पडली. त्यामुळे संधी असतानाही राष्ट्रवादीचे संघटनात्मक जहाज भरकटले, ही वस्तुस्थिती आहे.
अजित गव्हाणेंनी आत्मचिंतन करावे…
लांडे आणि पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘बब्बर शेर’आहेत. मात्र, विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नव्या कार्यपद्धतीमुळे ते अडगळीत पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ठोस प्रभाव दाखवता आलेला नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन गव्हाणे यांनी भाजपाला ‘लक्ष्य’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाही प्रकरणात कारवाई किंवा चौकशी झाल्याचे निदर्शनास आले नाही. मोशी कचरा डेपो आग प्रकरणात गव्हाणे यांनी रान पेटवले. मात्र, अद्यापही महापालिका प्रशासनाचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात आहे. भाजपातील किमान २५ नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा गव्हाणे यांनी केला होता. मात्र, वसंत बोराटे यांचा अपवाद वगळता एकाही भाजपाच्या माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. आंद्रा-भामा आसखेड पाणी प्रकल्पावर आक्षेप घेणाऱ्या गव्हाणे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रकल्प पाहणी करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. भाजपामधील नाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गव्हाणे यांना भाजपाचा पराभव करता येणार नाही, हे सत्य स्वीकारावे लागेल. त्यासाठी गव्हाणे यांनी केला होता. मात्र, वसंत बोराटे यांचा अपवाद वगळता एकाही भाजपाच्या माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. आंद्रा-भामा आसखेड पाणी प्रकल्पावर आक्षेप घेणाऱ्या गव्हाणे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रकल्प पाहणी करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. भाजपामधील नाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गव्हाणे यांना भाजपाचा पराभव करता येणार नाही, हे सत्य स्वीकारावे लागेल. त्यासाठी गव्हाणे यांनी आत्मचिंतन करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीतील निष्ठावंतांकडून व्यक्त केली जात आहे.
Read also
- “तर लोकं तुम्हाला काय बोलतात ते ही ऐका “? केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
- आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते मग सगळा अभ्यास त्यांनीच केला का?
- “उद्धव ठाकरे आजारी पडलेत तेव्हाच शिंदेंनी मुख्यमंत्री होण्याची चाचपाणी सुरू केली”
- यंदा गणपती बाप्पा लवकरच पावला; यंदा सर्व सण निर्बंधमुक्त होणार; मुख्यमंत्री
- “येणाऱ्या पंधरा दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत”; आढळराव पाटलांचा दावा