मुंबई : कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीवरून ठाकरे सरकारवर टीका झाली होती. भाजपसह विरोधी पक्षांना मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. मात्र मंदिरे लवकर खुली न केल्याने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले होते.
आता हिवाळी अधिवेशनात राज्यातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन केले जाणार असल्याची माहिती देत, आम्ही अद्याप हिंदुत्व सोडलेले नाही, असा टोला राज्यपाल आणि भाजपला लगावला आहे.
प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.
पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता यासोबतच येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल. टप्प्या-टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास करण्यात येणार असून त्यात कोणत्या मंदिरांचा समावेश करायचा याबाबत सभागृहाच्या सदस्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोबतच याच्यावरून कळेल की आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी भाजपला लगावला.