मुंबई – काँग्रेसने भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली असली तरी त्यांच्या अधिकारांना कात्रीही लावली आहे. मुंबई काँग्रेसच्या निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचे चेअरमनपद काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांकडे दिलं आहे.
मुंबई काँग्रेसमध्ये होणाऱ्या तिकीट वाटपाचा घोळ लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर प्रदेशाध्यक्षांनाच बसवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची दात नखेच काढून घेतल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयामुळे मुंबई काँग्रेसची स्वायत्ताच गेली असून हे पद निव्वळ शोभेची बाहुली बनल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष या दोन्ही स्वायत्त संस्था होत्या. मुंबईतील कोणताही धोरणात्मक निर्णय आणि पालिका निवडणुकीतील तिकीट वाटपाचा निर्णय सर्वस्वी मुंबई काँग्रेसच घ्यायची. त्यासाठी मुंबई प्रदेशाध्यक्षांच्या अंतर्गत स्क्रीनिंग समिती आणि स्ट्रॅटेजी समितीही यायची. मात्र, काँग्रेसने पहिल्यांदाच या दोन्ही समित्यांचं चेअरमनपद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांकडे सोपवलं आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या अधिकारांवरच गदा आली असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद हे शोभेची वस्तू झाल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत