पुणे: न्यायव्यवस्था वेळोवेळी जे काही आदेश देईल, त्यांची अमंलबजावणी करणे राज्य सरकारला बंधनकारक आहे. राज्यात कायदा कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये.राज्य कायद्यावर चालते, कुठल्याही अल्टिमेटमवर चालत नाही, त्यामुळे ज्यांना कुणाला आदेश द्यायाचे आहेत त्यांनी आपल्या घरच्यांना द्या. असा अप्रत्यक्ष टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. भोंग्याबाबत जी भुमिका मनसेने घेतली आहे, ती दिवसेंदिवस आक्रमक होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जी काही भोंग्याबाबत नियमावली घालून दिली आहे. त्याच नियमावलीनुसार राज्य सरकार निर्णय घेईल. त्यामुळे कोणी अल्टिमेटम देणार असेल तर ते चालणार नाही. सर्व गोष्टी कायद्यानुसार होतील, त्यामुळे कुणाला अल्टिमेटम द्यायाचा असेल तर घरच्यांना द्या. ही काही हुकूमशाही नाही. असे खडेबोल अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सुनावले.
काहीही झाले तरी सर्वांना आवाजाची मर्यादा पाळवाच लागणार आहे. जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कोणत्याही धार्मिक स्थळाकडून परवानगी घेण्यात आली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा इद साजरी झाली. त्यावेळी बरीच चर्चा करण्यात आली. जेवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवता येईल तेवढा ठेवण्याचे काम सरकारने केले. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारीही घेण्यात आली. त्यामुळे कोणी कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांना ज्या नोटिसा द्यायला हव्या होत्या, तेही केलं. असंही ते म्हणाले.