जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच शरद पवार गटातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे सध्या सुन रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला एकना खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे भावजईचा पराभव करण्यासाठी श्रीराम पाटलांचा प्रचार करतांना दिसत आहे.
हेही वाचा…“देश का मूड मोदी के खिलाफ हो रहा है”, शरद पवारांचं मोठं विधान
महाविकास आघाडीतील शरद पवार गटातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी आज रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की, धाबे पिंप्री, पिंप्री पंचम, कोठा, नायगाव, बेलखेडे, धामणदे, भोकरी नरवेल, पातोंडी या गावांमध्ये प्रचार फेरीत सहभाग घेतला. यावेळी मतदारांना अनुक्रमांक तीनवरील श्रीराम पाटील यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे बटण दाबून त्यांना विजयी करा, असे आव्हान देखील त्यांनी केले.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, सत्तेत येण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. पण उलट आपल्या राज्यातील रोजगार इतरत्र राज्यात पळवून तरुणांच्या हाताचे काम हिसकावण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले. महागाई, गॅसचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. पण याउलट गॅस ,किराणा व इतर जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ दरवाढ करून सामान्य जनतेला संसाराचा गाडा चालवणे मुश्किल केले. सत्ताधाऱ्यांनी शेतमालाच्या हमीभावात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. परंतु भावात वाढ तर केली नाहीच याउलट शेतीसाठीचे बि बियाणे खते व इतर आवश्यक वस्तूंच्या किमती चौपट करून शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढायचे आणि त्याच पैशांतून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करायची. असा फसवा खेळ सुरू केला आहे.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, काँग्रेसच्या कार्यकाळात देशात शेतीचे यांत्रिकीकरण झाले. सरकारने शेतकऱ्यांना शेती अवजारांवर, ट्रॅक्टरवर सबसिडी दिली. त्यामुळे शेतीची मशागत करणे सोयीचे झाले. याचा शेती उत्पादन वाढीसाठी मोठा हातभार लागला. परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांनी शेती साहित्य व शेती अवजारांवर जि. एस. टी कर लावला त्यातून त्यांच्या किंमती वाढल्या. पेट्रोल, डिझेल चे दर कमी करण्याचे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले होते.
ते कमी न करता उलट वाढवले वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमती मुळे शेतीची नांगरणी वखरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा दर ताशी हजार ते बाराशे रुपयांपर्यंत पोहचला. त्यामुळे आता ट्रॅक्टर द्वारे शेती ची मशागत करणे, सामान्य शेतकऱ्यांना न परवडण्या सारखे झाले आहे . म्हणून या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात शेती मशागत करण्यासाठी परत एकदा बैलांवर नांगर जुंपायची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. म्हणुन आता सामान्य नागरिक, महिला,तरुण, शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधी असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदानातून एल्गार पुकारून तुतारीची ललकारी बुलंद करा व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांना मतदान करून त्यांना बहुमताने विजयी करून आपले केळी पिक विमा, सिंचन, आरोग्य, रस्ते दळणवळण, व इतर प्रश्न संसदेत मांडण्यासाठी खासदार म्हणून दिल्लीला पाठवा असे आवाहन त्यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला”
हेही वाचा…“जो सध्या बोलबच्चन करतोय, त्याला मीच शोधून आणलं होतं”, अजित पवारांचा कोल्हेंवर निशाणा
हेही वाचा…“बारणेंना निवडून दिलं नसतं तर मी केंद्रात मंत्रीच झालो नसतो”,गडकरींचं मोठं विधान