सध्या कोरोनामुळे शाळा कॉलेजेस बंद असून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. मात्र यामुळे भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत आज महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा / वसतिगृह संचालक संघाची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांसोबत बैठक घेण्यात आली
शासनाच्या आदेशानुसार सध्या सर्व शाळा बंद असून आश्रम शाळांतील मूळ अडचण ही आहे की ही मुले दुर्गम डोंगराळ भागातल्या वाड्या-वस्त्या व तांड्यांवरची असून त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांना ऑनलाइन शिक्षण देणे कठीण आहे. परंतु या समाजातील मुलांकडे अँड्रॉइड फोन नसल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. आश्रमशाळांतील सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉइड मोबाइल फोन पुरवण्यात येण्यासंबंधात सरकारकडून काय उपाययोजना करता येईल यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र करावा ही प्रमुख मागणीही या बैठकीत नोंदवण्यात आली असून विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणा, थकित वेतन, शिक्षक भरती, परिपोषण अनुदान यासंदर्भातल्या मागण्या अधोरेखित केल्या गेल्या. या बैठकीस महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा / वसतिगृह संचालक संघाचे निमंत्रक. लक्ष्मण माने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हेही उपस्थित होते.