नवी मुंबई : विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटने जवळपास 30 वर्षे भारताची सेवा केली. आपल्या समुद्राचा आणि भारतीय नौदलाचा हा अभिमान आहे. त्याला भंगारात विकणे नक्कीच नौदलाच्या वारसासाठी धोकादायक असल्याचे म्हणत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आयएनएस विराटच्या जतनासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले आहे. सोबतच त्यांनी या ऐतिहासिक युद्धनौकाचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यास महाराष्ट्रला आनंद होईल, असेही म्हटले आहे.
नौदलातून निवृत्त झालेल्या आएनएस विराटच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे. प्रियंका चतुर्वेदींनी राजनाथ सिंह यांना पत्र लिहून हे थांबविण्याची मागणी केली आहे.
INS Viraat served India for nearly 30 years. It has been the pride of our seas&our Indian Navy. To see it sold as scrap&dismembered will be a huge disservice to our naval legacy. With RM’s NOC, a memorial on INS Viraat will be a reality. My letter to Shri @rajnathsingh ji on this pic.twitter.com/iJWthzjhVO
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) December 14, 2020
चतुर्वेदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, जरातच्या अलंग येथे ऐतिहासिक आयएनएस विराटच्या तोडकामाला सुरुवात झाल्याचे मी ऐकले आणि अतिव दुःख झाले. सन 2013 पर्यंत ३० वर्षे देशासाठी सेवा देणाऱ्या या ऐतिहासिक युद्धनौकेने दुसऱ्या महायुद्धातही महत्वाची भूमिका बजावली होती. ऑपरेशन ज्युपिटर आणि ऑपरेशन परक्रमामध्येही ही युद्धनौका तैनात होती.
भारताच्या नौदलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही ऐतिहासिक युद्धनौका नागरिकांसाठी अनमोल ठेवा आहे. त्यामुळे आयएनएस विराटचे म्युझियममध्ये रुपांतर करण्यात यावे, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात यावे. यासाठी मंत्रालयाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या ऐतिहासिक युद्धनौकाचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यास महाराष्ट्रला आनंद होईल, असेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.