नवी दिल्ली : महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींवरून, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिशा सालियन प्रकरणापासून ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत ठाकरे सरकारवरची संकटं संपायची नावं घेत नाहीयेत. त्यात मंत्रीमंडळातील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता तिसरा मंत्रीदेखील राजीनामा देईल, अशा चर्चांना सगळीकडून खतपाणी मिळत आहे.
दरम्यान, आज राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली, तर दुसरीकडे केंद्रातून देखील राज्यातल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देत प्रकाश जावडेकरांनी, राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली.
आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश जावडेकर यांनी, “महाराष्ट्रात गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा रेकॉर्ड ठेवणंही कठीण काम आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहे. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरलेला नाहीये”, असा हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी, “सचिन वाझेचे कारनामे एनआयएच्या चौकशी आता उघड झाले आहेत. अशा व्यक्तीचं मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत समर्थन का केलं? वाझे काहीतरी खुलासे करेल म्हणूनच त्याला पाठिशी घातलं जात होतं. आता वाझे यानं लिहिलेल्या पत्रात अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. हे अतिशय गंभीर आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकारच उरलेला नाही”, असा हल्लाबोल केला.
तसेच, “मुख्यमंत्री गप्प का? “पोलीस स्वतःच बॉम्ब ठेवतात, हे प्रकरण जगातलं एकमेव प्रकरण असावं. मंत्र्यांनी पोलिसांना वसुली करायला लावणं, ही अतिशय गंभीर बाब असून, पोलिसांना वसुली करायला लावणं, हाच राज्य सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. रोज या प्रकरणात इतकं काय काय समोर येतंय की याचा रेकॉर्ड ठेवणंही कठीण झालं आहे”, असं सांगत जावडेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
जावडेकरांनी महाविकास आघाडीच्या कारनाम्यांचा पाठ वाचत, “हे काही जनतेच्या मनातलं सरकार नाही, हे सरकार फक्त वसुली सरकार आहे. जनतेनं भाजपा आणि शिवसेना युतीला मतदान करुन कौल दिला होता; पण शिवसेनेनं गद्दारी करुन विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि जनतेनं दिलेल्या मतदानाचा अपमान केला, अशी टीका त्यांनी केली.