मुंबई: भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. मात्र काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरूपी झालेली नाही. याआधीही शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यात काही गैर नाही. राज्यात केवळ पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे, कायमस्वरूपी नाही, असे सुचक विधान नाना पटोले यांनी रविवारी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा करणाऱयांना फटकारले होते. याबाबत नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणातून कोणाला सल्ला दिला याची स्पष्टता झालेली नाही. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची पाच वर्षांसाठी निर्मिती झाली. त्यामुळे आम्ही पर्मनंट आहोत असा उल्लेख कुठेही नव्हता. प्रत्येक पक्षाला पक्षाची ताकद वाढविण्याचा अधिकार आहे. कोरोना काळात जनतेला मदत करण्याला काँग्रेस पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. मग ते रक्तदान असो, ऑक्सिजन असो किंवा मग प्लाझ्मा. कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठी मदत केली आहे.
…तर शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढेल
आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्यांचे अध्यक्ष स्वबळाबद्दल बोलत असले तरी जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा आम्ही सर्व एकत्र लढू असे मला वाटतेय. जर काँग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचा नारा धरला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जातील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
गोंधळातून बाहेर या
महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्या पक्षातदेखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो आमची भूमिका नाही. त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावे आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे त्यावर निर्णय घ्यावा, असा सल्ला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.