मुंबई : पदवीधर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्र निवडणूक लढवण्याचा फायदा झाला होता. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुका देखील तिन्ही पक्ष एकत्र लढवणार का ? याविषयी सातत्याने चर्चा सुरू आहेत. यातच आता आगामी मुंबई महापालिका निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक म्हणाले की, फेब्रुवारीपासून आम्ही पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी सभा सुरू झाल्या होत्या, परंतु कोरोनामुळे त्या थांबल्या. या सभा आणि बैठका आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. महविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलं आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन कामं करावी, असा प्रयत्न आहे.
तर दुसरीकडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे इतर सगळ्यांना विरोध राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
भाई जगताप यांच्या या विधानावर बोलताना मलिक म्हणाले की, आमची भूमिका एकत्र लढायची आहे, मुख्यमंत्र्यांनीही तसे स्पष्ट केले आहे. काही लोकांचे वैयक्तिक मत वेगळे असू शकते. मात्र काँग्रेसची अधिकृत भूमिका अजून त्यांनी जाहीर केलेली नाही.
महाविकास आघाडीने मुंबई महापालिका निवडणुकीबाबतचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरवलेला नाही, मुळात त्याबाबत कोणतीही बैठक झालेली नाही, असेही ते म्हणाले.