मुंबई : कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे. मागासवर्गीयांच्या पदन्नोतेतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांयकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे.
आज सकाळपासूनच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ये- जा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच सिल्वर ओकवर दाखल झाले आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील पोहोचले. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नुकताच भाजपचे खासदार संभाजी राजे यांनी पवारांची भेट घेतली. ही सर्व नेतेमंडळी पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष टिकणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.