मुंबई : ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे. कुणी मराठीचा अपमान करत असेल तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील’ अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला. लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सला मनसेने चोप दिल्यानंतर शिवसेनेनेही या वादात उडी घेतल्याचे दिसत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी संवाद साधला. सराफा व्यापाराने माफी मागितली आहे. शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शोभा देशपांडे यांना त्यांच्या घरी सोडले. त्यानंतर शोभा देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना ‘मातोश्री’च्या आठवणी स्मरल्या. शोभा देशपांडे यांनी बारा तासांहून अधिक काळ कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या दुकानासमोर आंदोलन केले होते.
दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडला होता. त्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला चोप दिला.कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली होती. दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली, पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला होता.
“मुंबई पोलिसांचा तपास निःपक्ष”
‘मुंबई पोलीस अत्यंत प्रोफेशनल आहेत. ते कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. त्यांचा तपास निःपक्ष असतो. ते कधीही सूडाच्या भावनेने तपास करत नाहीत. मुंबई पोलिसांनी केलं की सूडाच्या भावनेने आणि किंचाळणाऱ्या चॅनलने केलं की ती सद्भावना होते का? जर कुणी म्हणालं की लोकांना चॅनेल बघण्यासाठी पैसे वाटले ते ड्रग्स रॅकेटमधून आले, तर ते चालेल का?’ असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
बिहार निवडणुकांपूर्वी राऊत पाटण्याला जाणार
‘बिहारमध्ये जवळपास 50 जागा लढवण्याची तयारी आहे. मी स्वतः पाटण्यात जाईन. काही मतदारसंघात जाईन. माझ्याबरोबर नेते-खासदार असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-मंत्री आदित्य ठाकरे व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधन करतील’ अशी माहिती राऊत यांनी दिली.
“अश्विनीकुमारांच्या आत्महत्येनंतर प्रश्न का पडले नाहीत?”
दरम्यान, मीडियाने एका अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर जे वादळ निर्माण केलं, अशा प्रकारचे प्रश्न सीबीआयचे माजी संचालक असलेल्या अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येनंतर का पडले नाहीत? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.‘अश्विनीकुमार यांनी सीबीआयचे प्रमुख असताना अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला.
ते गुन्हे वादग्रस्त होते. अशा व्यक्तीने आत्महत्या करावी असे काय घडले? सीबीआयचे अधिकारी मनाने खंबीर असतात. अश्विनी कुमार आत्महत्या करतात आणि त्या प्रकरणाची फाईल दोन तासात बंद होते. आणि याचा कोणत्याही किंचाळणाऱ्या चॅनलला प्रश्न पडू नये याचं मला दुःख आहे’ असा टोलाही राऊतांनी लगावला.
Read Also :
राजेंविरूद्ध वादग्रस्त वक्तव्य भोवणार, प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखलhttps://t.co/bbCOvaRQGa
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 9, 2020