मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवार कितीवेळा परीक्षा देऊ शकतात, याची संख्या आता निश्चित केली आहे. यासंदर्भात एमपीएससी परिपत्रक जारी केले असून, 2021मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीला अनुसरून होणाऱ्या परीक्षांपासून कितीवेळी परीक्षा देता येतील, याची मर्यादा घातली आहे.
एमपीएससीच्या परिपत्रकानुसार, आता खुल्या गटातील प्रत्येक उमेदवाराला सहा संधी मिळतील. तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील. . अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.
यापुर्वी उमेदवार कितीही वेळा परीक्षा देऊ शकत असे. मात्र आता आयोगाकडून यासाठी ठराविक मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेची उपस्थिती संधी गणली जाईल.