मुंबई : कृषी कायद्यावर कोणत्याही प्रकारची चर्चाच होऊ शकत नाही. हा कायदाच मागे घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत शेतकरी दिल्लीतून हलणार नाहीत, असा इशाराही मेधा पाटकर यांनी दिला आहे. केंद्र सरकारने अखेर शेतकरी आंदोलनाची दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हणूनच शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे, असं सांगतानाच पण कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही. हा कायदा सरकारला मागे घ्यावाच लागेल, असं मेधा पाटकर म्हणाल्या.
फूट पाडण्याच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांचं उत्तर
एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी दिल्लीत तळ ठोकून आहे. त्यांची दखल सरकारला घ्यावीच लागणार आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही बळीराजाच्या आंदोलनात सामिल झाला आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकरी इथून हालणार नाहीत. पंजाबच्या शेतकऱ्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत आज 13 प्रतिनिधींना सरकारशी चर्चा करायला जायला सांगितलं असून फोडाफोडीच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांनी दिलेलं हे उत्तर आहे, असं मेधा पाटकर म्हणाल्या.
भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद
दरम्यान, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बळीराजाने मोटार आणि ट्रॅक्टर रॅली काढून सरकारचा निषेध नोंदवताना काही ठिकाणी केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन केले आहे. आज राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट होता. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये भाग घेतल्याने मार्केट बंद होते. राजकीय पक्षांनीही या बंदमध्ये भाग घेऊन अनेक ठिकाणी निदर्शने केली. राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होती. आजच्या बंदला राज्यात कुठेही गालबोट लागले नाही. शेतकऱ्यांनी शांततेत बंद पाळून सरकारच्या आडमुठ्या धोरणांचा निषेध नोंदवला.
एपीएमसी मार्केटमध्ये शुकशुकाट
आजच्या बंदचा फटका एपीएमसी मार्केटलाही बसला आहे. राज्यातून ठिकठिकाणाहून आलेला शेतमाल सध्या वाशी एपीएमसी येथे ट्रक टर्मिनलमध्येच आहे. हा माल घेऊन असंख्य ट्रक उभ्या असल्याने ट्रक टर्मिनलमध्ये हजारोंच्या संख्येने भरलेले व रिकामे ट्रक उभे आहेत. एकीकडे एपीएमसीतील पाचही बाजारपेठ बंद असल्याने एपीएमसी परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या बाजारसमितीचे पूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत.
Read Also :
‘मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?’, काँग्रेस नेत्याचं संतापजनक विधान
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?,फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’
‘आता तुम्ही हिमालयात जाणार का?’ पत्रकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं मौन